राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवरून विधानसभेत जोरदार वादळ उठले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात केवळ १५ हजार शिक्षक पदे रिक्त असल्याचे सांगितल्यानंतर विरोधकांनी या आकडेवारीवर तीव्र आक्षेप घेतला.
काँग्रेस नेते विजयी वडेट्टीवार यांनी प्रत्यक्षात ३७ हजार जागा रिक्त असल्याचा दावा करत चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप केला.
बदली प्रक्रियेवरूनही सभागृहात चर्चा रंगली. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने सुमारे १२ हजार शिक्षक अद्याप बदलीविना असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, मंत्री गोरे यांनी बदलीचे वेळापत्रक निश्चित असून नियोजनानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले.
या मुद्द्यावर विरोधक अधिक आक्रमक झाले. नाना पटोले यांनी थेट हक्कभंगाचा इशारा देत सरकारवर गंभीर आरोप केले. कोकणासारख्या भागात शिक्षकांची कमतरता, तर काही ठिकाणी सोयीच्या जागांवरच बदल्या होत असल्याचेही सदस्यांनी सभागृहात मांडले. या साऱ्या आरोपांमुळे प्राथमिक शिक्षणातील रिक्त जागांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

Comments are closed.