महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने ‘करिअर कट्टा’ उपक्रम राबवला आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दरवर्षी ३६५ रुपये शुल्क आकारले जात असून, एकूण ११० कोटी रुपयांचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडतो. हा उपक्रम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साह्यता केंद्र या कोल्हापूरस्थित खासगी संस्थेद्वारे राबवला जात असून, केंद्र सरकारच्या ‘स्वयम्’ सारख्या विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांना हे शुल्क अनिवार्यरित्या भरावे लागते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘करिअर कट्टा’ उपक्रमाची सुरुवात फेब्रुवारी २०२१ मध्ये तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात झाली. उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीत मदत करणे, उद्योजकता निर्माण करणे आणि इंग्रजी संवाद कौशल्य विकसित करणे असे आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयात समन्वयक नेमले जातात, जे विविध कार्यशाळा, करिअरविषयक कार्यक्रम राबवतात.
उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी परिपत्रक जारी करून निर्देश दिले आहेत की, ‘करिअर कट्टा’साठी ३६५ रुपये विद्यापीठांच्या शुल्क संरचनेत ‘विविध गुणदर्शन आणि उपक्रम शुल्क’ या शीर्षकांतर्गत समाविष्ट करावे. महाविद्यालयांनी शुल्क आकारल्याची माहिती विभागीय सहसंचालक कार्यालयात सादर करावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तत्काळ कार्यवाही करून शुल्क आकारण्यास मान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सहभागी होणे ऐच्छिक असून, शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून केली जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक अडचण येत असल्यास, उच्च व तंत्रशिक्षण विभाग सकारात्मक निर्णय घेईल. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साह्यता केंद्र यांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असून सुसूत्रतेने राबविला जात आहे.

Comments are closed.