राज्यात बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रवेशांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तब्बल ७ महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी दाखल झालेला नाही, तर ४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशक्षमता २० टक्क्यांपर्यंतही भरलेली नाही. त्यामुळे अनेक कॉलेजमध्ये वर्गच रिकामे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२०२५–२६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील २९४ महाविद्यालयांमध्ये १६,५३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, यापैकी केवळ १०,९५७ जागा भरल्या गेल्या, तर ५,५७३ जागा रिक्त राहिल्या. मागील तीन वर्षांत बीएससी नर्सिंग कॉलेजांची संख्या १८३ वरून थेट २९४ पर्यंत पोहोचली असून, जागांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. सांगलीतील ७ कॉलेजमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी, तर अहिल्यानगर, कोल्हापूर, बीड आणि यवतमाळ जिल्ह्यांतही अनेक कॉलेजमध्ये अत्यल्प प्रवेश झाले आहेत. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता आणि महाविद्यालयांची आर्थिक शाश्वतता धोक्यात आली आहे.
असे असतानाही २०२६–२७ साठी १३२ नव्या नर्सिंग कॉलेजांचे प्रस्ताव सादर झाल्याने भविष्यात रिक्त जागांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गरज सुमारे १० हजार नर्सेसची असताना जागा १६,५०० च्या पुढे गेल्या असून लवकरच त्या २० हजारांहून अधिक होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.