लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांचा ₹१५०० चा हप्ता थांबवण्यात आला होता. विशेषतः डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.
ई-केवायसी करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याच्या असंख्य तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या. याची दखल घेत राज्य सरकारने आता लाभ बंद झालेल्या महिलांसाठी फेर ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाभ पुन्हा सुरू होण्याची आशा महिलांना मिळाली आहे.
या फेरपडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती तपासणार असून, कागदपत्रांची खातरजमा केली जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
फेर ई-केवायसी दरम्यान महिलांचे उत्पन्न, कुटुंबातील कोणतीही सरकारी नोकरी आहे का, एकाच कुटुंबातील किती सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत, यासह सर्व निकषांची तपासणी केली जाणार आहे. सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार असून, त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.