राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील गंभीर प्रश्न आता चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात सर्वात महत्वाची मागणी म्हणजे ‘पशुधन पर्यवेक्षक वर्ग ३’ मधील तब्बल ३४०० रिक्त पदे तात्काळ भरण्याची. तसेच, ‘एलएमडीपी’ डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांची शासनामार्फत नोंदणी करून त्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश सरचिटणीस राहुल महामुनी यांनी हे निवेदन मंत्र्यांकडे सादर केले. या निवेदनावर हजारो विद्यार्थ्यांच्या सह्या असून, त्यातून विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न स्पष्ट होतो.
निवेदनात म्हटले आहे की, “मागील अनेक वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती झालेली नाही. मनुष्यबळ कमी असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला २०-२० गावे सांभाळावी लागतात. परिणामी, लसीकरण वेळेवर होत नाही आणि लम्पीसारख्या आजारांमुळे जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.”
विद्यार्थ्यांनी असेही नमूद केले आहे की, “विभागाने भरतीसाठी आकृतीबंध तयार केला आहे, फक्त शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जर हे आदेश लवकर दिले गेले, तर विभागाच्या कार्यक्षमतेत मोठा सुधारणा होऊ शकतो.”
“आमच्यासारखे हजारो विद्यार्थी गेल्या ७ वर्षांपासून या भरतीची तयारी करत आहेत. वयोमर्यादा वाढत असल्यामुळे अनेक विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत, ज्यामुळे नैराश्य पसरत आहे,” असे निवेदनात अधोरेखित केले आहे.
विद्यार्थ्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून, जिल्हा परिषद भरतीमध्ये पशुधन पर्यवेक्षक पदांचा समावेश करावा, आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी कळकळीची विनंती केली आहे.
या मागण्यांमुळे सरकार आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक प्रगतीशील मार्गाने घडवून आणला जाऊ शकतो. जर योग्य ती भरती प्रक्रिया तत्काळ सुरू झाली, तर पशुसंवर्धन विभागात कामकाज सुधारेल आणि विद्यार्थ्यांच्या करिअरला चालना मिळेल.

Comments are closed.