मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून शासनाने जून ते सप्टेंबर दरम्यानच्या हानीसाठी ८,७०८ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंत ७६.८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,७०५ कोटी रुपये जमा झाले असले तरी मोठा प्रश्न उभा राहिला आहे—ई-केवायसी न केल्याने तब्बल ४.९७ लाख बाधित शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यांची नावे यादीत असूनही खात्यात निधी जमा होऊ शकलेला नाही.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पंचनामे, निधी मागणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून शासनाने टप्प्याटप्प्याने मदत वाटप सुरू केले. ही मदत जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत देण्यात येत आहे.
विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, एकूण ८३.५१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून त्यापैकी बहुतेकांना मदत मिळाली आहे. मात्र ई-केवायसी प्रलंबित असल्याने लाखो शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे अजूनही रोखले गेले आहेत.

Comments are closed.