कृषी संस्थांमधील रिक्त पदे लवकरच भरणार; कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे निर्देश! | Major Recruitment Drive in Agri Institutions!

Major Recruitment Drive in Agri Institutions!

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रीय कृषी विद्यार्थी परिषदेत (National Agriculture Students Conference) कृषी शिक्षण क्षेत्रातील उणिवा दूर करून त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

Major Recruitment Drive in Agri Institutions!

दिल्लीच्या पूसा येथे आयोजित या परिषदेत देशभरातील शेकडो कृषी विद्यार्थी सहभागी झाले आणि केंद्रीय मंत्र्यांशी थेट संवाद साधला.

चौहान यांनी स्पष्ट केले की देशातील अनेक कृषी संस्थांमध्ये शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक अशा दोन्ही प्रकारची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) च्या महासंचालकांना सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी सांगितले की, राज्य कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील रिक्त पदे भरावीत यासाठी ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक पत्र लिहिणार असून, संबंधित कृषी मंत्र्यांशी देखील चर्चा करणार आहेत.

मंत्री चौहान म्हणाले, “कृषी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत खेळ होऊ देता कामा नये.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यांनी ICAR ला सूचित केले की विद्यार्थ्यांकडून थेट रचनात्मक सूचना मिळाव्यात म्हणून ‘विद्यार्थी सल्लागार टीम’ स्थापन करावी. तसेच कृषी विद्यापीठांच्या ग्रेडिंग प्रणालीला बळकटी देऊन आरोग्यदायी स्पर्धा निर्माण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

जगभरात राबविण्यात येणारे यशस्वी कृषी प्रयोग भारतातही अमलात आणण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे चौहान यांनी आवाहन केले.

परिषदेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि अडचणी मांडल्या. त्यावर मंत्री चौहान यांनी लक्ष देऊन योग्य तो उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की — “दरवर्षी किमान एकदा शेतकऱ्यांच्या शेतावर भेट द्यावी. त्यामुळे शेतीची वास्तव परिस्थिती समजेल आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्याची प्रेरणा मिळेल.”

शेवटी मंत्री चौहान म्हणाले, “विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न शेतीच्या प्रगतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या प्रक्रियेत कृषी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे.”

Comments are closed.