मुंबईसह आठ जिल्ह्यांमधील २०२५ साठीच्या पहिल्या तुकडीसाठी ‘अग्नीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना १० एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. ‘अग्नीवीर’ योजना ही १६ वर्षांपासून संरक्षण दलांमध्ये देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून देणारी योजना आहे.
चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. तसेच, दरमहा २१ हजार ते २८ हजार रुपयांचे वेतनही मिळते. या माध्यमातून भारतीय भूदलात (Indian Army) सेवा देण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई भूदल भरती अधिकारी (ARO) कार्यालयाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. जून महिन्यात चाचणी होणार असून ती पूर्णपणे ऑनलाईन असेल. उमेदवारांनी पर्याप्त चार्ज असलेला आणि किमान २ जीबी डेटा असलेला स्मार्टफोन सोबत आणणे आवश्यक आहे.
यासंबंधी अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान, ही भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित आहे. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नयेत किंवा लाचखोरीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच खोटे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन ARO तर्फे करण्यात आले आहे.