सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारणीचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या पार्कमुळे हजारो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सोलापूर शहराचा विकास वेगाने होईल, असे ते म्हणाले.

सोलापूर-गोवा विमानसेवेनंतर मुंबई व पुणे सेवांची अपेक्षा
सोलापूर-गोवा विमानसेवेच्या यशानंतर आता सोलापूरला थेट मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची अपेक्षा आहे. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापुरातील उद्योग-व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राला मोठा हातभार लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जलवाहिनी आराखडा : ८७२ कोटींचा भव्य प्रकल्प
शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ८७२ कोटींचा जलवाहिनी आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा राबविण्यात आला तर नागरिकांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा तोडगा निघेल. “माझं सोलापूर सुंदर सोलापूर” हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारची ही महत्त्वाची पायरी ठरेल.
गृहनिर्माण प्रकल्पात १,३४८ घरांचे वितरण
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत म्हाडातर्फे उभारलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात दहिटणे येथे ११२८ आणि शेळगी येथे २२० असे मिळून १,३४८ सदनिकांचे वितरण करण्यात आले. या वितरणप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. हा उपक्रम सामान्य नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला आकार देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले.
‘सोलापूर पॅटर्न’ : परवडणाऱ्या घरकुलांची दिशा
सोलापुरात ४८ हजार कुटुंबांना घरे बांधून देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी २५ हजार घरे पूर्ण झाली असून २० हजार घरे वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित घरांचे काम सुरू असून, ‘सोलापूर पॅटर्न’ ही योजना राज्यातील इतर भागांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
सौरऊर्जेवर चालणारी घरे
प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात ३० लाख घरांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या घरांवर सौरऊर्जेचा वापर करून मोफत वीज उपलब्ध करून देण्याची योजना राबवली जाणार आहे. यामुळे ऊर्जासंचय तर होईलच, पण पर्यावरणपूरक घरकुलांचाही नवा पॅटर्न उभा राहील.
खासगी विकासकाला लाजवेल अशी घरे
सोलापुरातील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अंकुर पुंदे यांनी घेतलेली पुढाकार विशेष ठरली. कमी खर्चात दर्जेदार घरे उभारून त्यांनी खासगी विकासकांनाही लाजवेल असे काम केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले असून सोलापूरने महाराष्ट्राला परवडणाऱ्या घरांची दिशा दाखवली आहे, असे नमूद केले.
सोलापुराच्या वैभवात भर
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, गृहनिर्माण प्रकल्पामुळे सोलापुराच्या वैभवात भर पडली आहे. पुढील काळात आयटी पार्क उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. तसेच रस्ते, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा लाभार्थ्यांना मिळत असल्यामुळे सोलापूर शहराचा विकास आणखी वेगाने होईल.

Comments are closed.