राज्यात विविध ठिकाणी उद्योग, आयटी, अन्नप्रक्रिया, गोदाम, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारण्यासाठी एकूण १,०८,५९९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
यामुळे अंदाजे ४७ हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारांचे हस्तांतर झाले.
एमजीएसए रिअॅलिटी विविध ठिकाणी औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर व लॉजिस्टिक हब उभारण्यासाठी ५ हजार कोटी रुपये गुंतवत असून यातून १० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्कसाठी लोढा डेव्हलपर्स ३० हजार कोटी रुपये गुंतवत असून या प्रकल्पातून ६ हजार युवकांना नोकरी मिळणार आहे.
नागपूरमधील कमलेश्वर लिंगा येथे एकात्मिक कोळसा सरफेस वायूकरण प्रकल्प उभारण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस ७० हजार कोटी रुपये गुंतवत असून यातून ३० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
नंदुरबारमध्ये पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड पॉलिमेरिक उत्पादन प्रकल्पासाठी २,८६ कोटी रुपये गुंतवत असून यामुळे ६०० लोकांना नोकरी मिळणार आहे.
काटोल, नागपूर येथे रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड अन्न, पेये व खाद्य उत्पादनासाठी १,५१३ कोटी रुपये गुंतवत असून याद्वारे ५०० जणांना रोजगार मिळणार आहे.