राज्यभर प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळावर मनुष्यबळाच्या कमतरतेचा मोठा ताण आहे. सध्या महामंडळात सुमारे २० हजार चालक आणि ४ हजार सहाय्यक पदे रिक्त असून, याचा थेट परिणाम प्रवासी सेवा आणि महसुलावर होत आहे.
त्यामुळे कंत्राटी भरतीऐवजी नियमित कर्मचारी भरतीला तातडीने मंजुरी द्यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सरकारकडे केली आहे.
गेल्या दहा वर्षांत एसटी महामंडळात नियमित नोकरभरती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बाह्य संस्थांमार्फत १७,४५० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय वादग्रस्त ठरत आहे. या प्रक्रियेत मध्यस्थ आणि दलालांचे हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोप कामगार सेनेने केला आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष व खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्याची ठाम मागणी केली आहे.
कंत्राटी चालकांकडे पुरेसा अनुभव व सुरक्षित वाहनचालकतेचे कौशल्य नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि एसटी सेवेच्या दर्जासाठी नियमित भरती हाच एकमेव मार्ग असल्याचे कामगार सेनेचे मत आहे.

Comments are closed.