देशात आणि परदेशात नाव कमावलेल्या एका मोठ्या आयटी कंपनीनं आपल्या तब्बल १२ वर्षं काम केलेल्या कर्मचाऱ्यावर थेट नोकरी सोडण्याचा दबाव टाकल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. या कर्मचाऱ्यानं आता कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय.
फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज महाराष्ट्र या संघटनेनं समाजमाध्यमांवर ही माहिती दिलीये. त्यांनी स्पष्ट केलंय की, कंपनी मनुष्यबळ कपात धोरण राबवत असून, कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार न करता निर्णय घेतलाय. त्या कर्मचाऱ्यानं आपल्या आयुष्यातले बहुमोल १२ वर्षं कंपनीला दिले, तरीही त्याचं भविष्य धोक्यात आलंय.
संघटनेनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केलीये. तसंच इतर कुणाच्या बाबतीत असं होत असेल, तर त्यांनीही संघटनेशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय.
कंपनीकडून सांगितलं जातं की, ज्यांच्याकडे अद्ययावत कौशल्यं नाहीत, त्यांनाच काढून टाकलं जातं. पण या कर्मचाऱ्याजवळ ती कौशल्यं असूनही त्याला प्रकल्पच दिले जात नाहीत – म्हणजे त्याला कामच देत नाहीत! ही धोरणं चुकीची असून, भरती वेळी विचार न करता मोठ्या प्रमाणात लोक घेतले जातात आणि मग गरज नसल्याचं लक्षात आल्यावर कपात सुरू होते.
संघटनेचं म्हणणं आहे – “हे सगळं थांबायला हवं!”
काही जणांनी सोशल मीडियावर हेही म्हटलंय की कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर काहींनी हे कर्मचाऱ्यांचं शोषण आहे, असं ठामपणे मांडलंय.

Comments are closed.