इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत १३,२४,६४६ विद्यार्थ्यांनी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अजूनही ८,४२,८९६ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी अंतिम फेरी गुरुवार (दि. ११) पासून सुरू होणार आहे.
संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ही ११वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन प्रथमच राबवली जात आहे. राज्यातील ९,५४४ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, ज्या महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता २१,६७,५४२ आहे.
एकूण १४,८३,०३३ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी १३,४३,९६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) भरला आहे. आता अंतिम फेरीत नवीन नोंदणी, कोटा जागा प्रत्यावंटन, महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढविणे इत्यादी कामे पार पडतील.
विद्यार्थ्यांसाठी नोंदणी व अर्ज दुरुस्तीची मुदत ११ ते १२ सप्टेंबर ठेवण्यात आली आहे, तर प्रवेश निश्चित करण्यासाठी १२ ते १३ सप्टेंबर पर्यंतची वेळ आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

Comments are closed.