७० हजार कोटींची गुंतवणूक; ३० हजार रोजगारांची संधी – विदर्भात उभारणार कोळसा वायूकरण मेगा प्रकल्प! | ₹70,000 Cr Project; 30K Jobs!

₹70,000 Cr Project; 30K Jobs!

नागपूरजवळील कळमेश्वर येथील लिंगा परिसरात सुमारे ७० हजार कोटी रुपयांचा एकात्मिक कोळसा वायूकरण व रासायनिक प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पातून अंदाजे ३० हजार थेट रोजगार निर्माण होतील, अशी माहिती अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी यांनी दिली. ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६’ औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. हा प्रकल्प देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि प्रगत रासायनिक उत्पादनांच्या क्षेत्रात नागपूरचे स्थान जागतिक पातळीवर अधिक बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.

₹70,000 Cr Project; 30K Jobs!

विदर्भ हा केवळ महाराष्ट्राचा भाग नसून भविष्यात भारताच्या विकासकथेचे नेतृत्व करणारा प्रदेश ठरेल, असे सांगताना त्यांनी विदर्भाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा उल्लेख केला. नागपूर आज लॉजिस्टिक्स, विमानवाहतूक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनत असून देशाच्या मध्यभागी असलेले भौगोलिक स्थान आणि नियोजनबद्ध शहरी विकास यामुळे शहर वेगाने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.

राजकीय नेतृत्वाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे विदर्भातील विकासाला वेग मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासनीतीमुळे संसाधनसमृद्ध प्रदेशांना राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी स्थान मिळाले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पायाभूत सुविधांवरील भरामुळे महामार्ग व लॉजिस्टिक्स नेटवर्क मजबूत झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विदर्भाच्या संतुलित प्रादेशिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

अदानी समूहाचा विदर्भातील सहभाग हा केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून ऊर्जा सुरक्षा, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाचा दीर्घकालीन प्रवास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिरोडा येथील ३,३०० मेगावॅट क्षमतेचा सुपरक्रिटिकल वीज प्रकल्प आणि बुटीबोरी येथील ६०० मेगावॅट प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे राज्यातील ऊर्जा क्षमता वाढली आहे. तसेच विविध प्रकल्पांद्वारे महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट विश्वासार्ह वीजपुरवठ्याचा २५ वर्षांचा करार राज्याच्या औद्योगिक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल.

गोंधखैरी येथील भूमिगत खाण प्रकल्पाद्वारे कमी भूवापर, विस्थापन टाळणे, स्फोटनाशिवाय उत्खनन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अशा पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉजिस्टिक्स क्षेत्रात बोरखेडी येथील आयसीडी आणि राज्यातील सीमा तपासणी नाक्यांचे व्यवस्थापन यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन निर्यात क्षमता वाढणार आहे.

मिहान परिसरातील इंडामर टेक्निक्सच्या अधिग्रहणामुळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र म्हणून विकसित होत आहे. अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, महिला स्वयंसहायता गट, पोषण, स्वच्छ पाणी, सौर ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्रातही विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments are closed.