पूर्ण माहिती, कशी कराल EKYC, रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य! अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2025!!
E-KYC Mandatory for Ration Card Holders! Deadline – February 28, 2025
आपण रेशन कार्ड धारक असाल तर आपल्यासाठी महत्वाची माहिती! सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने आणि त्यासंबंधित सर्व प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी देशभरात 100% ई-केवायसी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी प्रमाणिकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड आणि शिधापत्रिका घेऊन लवकरात लवकर सत्यापन करून घेणे अत्यावश्यक आहे. हि प्रेयोसेस एकदम सोपी आहे, खाली दिलेल्या स्टेप्स प्रमाणे आपण ऑफलाईन/ऑनलाईन हि प्रोसेस करू शकता.
जिल्ह्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकाने आपल्या संपूर्ण कुटुंबासह शिधापत्रिकेतील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापन करणे बंधनकारक आहे. जर हे सत्यापन वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून वगळली जाऊ शकतात किंवा त्यांना शिधा जिन्नस मिळणे थांबू शकते. त्यामुळे, आपल्या कुटुंबाच्या शिधा लाभात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून शिधापत्रिकाधारकांनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांवर जाऊन आधार कार्ड आणि शिधापत्रिका यांची पडताळणी करून घ्यावी. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ही प्रक्रिया संपूर्ण मोफत आहे. तरीही काही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर शिधापत्रिकेवरील लाभ प्राप्त होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी वेळेतच आपली नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.