एकेकाळी ‘आयटी म्हणजे सोन्याचं खाण’ असं वाटायचं. पण हल्ली सगळंच उलटं चाललंय. देशातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी इन्फोसिस सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत चाललीय. आणि यावेळी फटका बसलाय १९५ प्रशिक्षणार्थ्यांना — जे ट्रेनिंग दरम्यान घेतलेल्या अंतर्गत चाचणीत पास होऊ शकले नाहीत.
काय घडलं नेमकं?
या प्रशिक्षणार्थ्यांनी ट्रेनिंग दरम्यान दिलेली मूल्यांकन चाचणी दोनदा नापास केली होती. आणि कंपनीने स्पष्ट धोरण ठेवत अशा उमेदवारांना थेट बाहेरचा रस्ता दाखवलाय. याआधीही इन्फोसिसने अशाच प्रकारे नापास उमेदवारांवर कारवाई केली होती.
म्हणजे आयटीतही स्पर्धा जीवघेणी झालीये…
पूर्वी असं वाटायचं की आयटी कंपनीत लागलो की झालं — नोकरी सेफ, पगार भारी. पण आता तसं नाही. जॉइनिंग मिळाल्यावरही जर ट्रेनिंगमध्ये यश मिळालं नाही, तर नोकरी काही गॅरंटी नाही. अभ्यास, शिस्त आणि कौशल्य याशिवाय टिकून राहणं अवघड झालंय.
तरुणांसाठी इशारा!
सध्या हजारो तरुण आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात आहेत. पण हे उदाहरण स्पष्ट दाखवतं की फक्त नोकरी मिळवणं पुरेसं नाही — ती टिकवणं खूपच कठीण झालंय. त्यामुळे ट्रेनिंगच्या दरम्यानच मेहनत, चिकाटी आणि तयारी हवीच. नाहीतर मोठ्या कंपनीत लागूनही काहीच हाती लागत नाही.